पालघर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी बदली होऊन ही कार्यमुक्त न झाल्याने वादाच्या भोवऱ्यात
पालघर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून विविध कारणांनी नेहमीच विरोध होणाऱ्या वादग्रस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिलारे यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांनी आरोप केल्याने त्या पुन्हा एकदा वादाच्या कचाट्यात सापडल्या आहेत.
पालघर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी बदली होऊन ही कार्यमुक्त न झाल्याने वादाच्या भोवऱ्यात
पालघर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून विविध कारणांनी नेहमीच विरोध होणाऱ्या वादग्रस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिलारे यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांनी आरोप केल्याने त्या पुन्हा एकदा वादाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सध्या कार्यरत असलेल्या संघरत्ना खिलारे या २०१६ ते २०२० अशी पाच वर्षे पालघर जिल्हा परिषदेत विविध विभागांमध्ये विभागप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला आहे. या अगोदर त्या स्वछता व पाणी पुरवठा विभागात कार्यरत असून समाज कल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता. याचदरम्यान त्यांची बदली पुन्हा पालघर जिल्हा परिषदेच्याच सामान्य प्रशासन विभागात झाली. ही बदली त्यांनी स्वतः करुन घेतल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य करीत आहेत.
खिलारे ह्या जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा तसेच समाजकल्याण विभागात काम करीत असताना त्यांच्यावर शासकीय निधीत अपहार केल्याचा आरोप व कामकाजाबाबत अनियमितता असे अनेक प्रश्नचिन्ह सर्वसाधारण सभेत व स्थायी समितीत सदस्यांनी त्यांच्याबाबत उपस्थित केले आहेत. पाणीपुरवठा विभागात भाडोत्री वाहन भाडे घोटाळा तसेच समाजकल्याण विभागातील बेंजो, डीजे घोटाळा असे अनेक प्रश्न त्यावेळी उपस्थित झाले होते. मात्र त्यावेळी त्यांची होणारी चौकशीही लालफितीतच अडकुन पडली आहे. तर सामान्य प्रशासन विभागात बदली झाल्यानंतर खिलारे यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप केले गेले. जिल्हा परिषदेतील अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांनी नाहक त्रास दिला असल्याचे अनेक कर्मचारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगत आहेत.
इतकेच नव्हे तर या पदावर बसल्यानंतर त्यांनी अनेक घोटाळे केल्याचे आरोप जिल्हा परिषद सदस्य करीत असून याची चर्चा जिल्हा परिषदेच्या व्हाट्सएप समूहातून होताना दिसत आहेत. जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरती प्रक्रिया, पदोन्नत्ती प्रक्रिया, कर्मचारी नियुक्त्या, कर्मचारी बदलीच्या सेवा ज्येष्ठता यादीत हस्तक्षेप, शिक्षण विभागात मनमर्जी कर्मचारी नियुक्ती, आंतरजिल्हा बदलीने शिक्षक सोडणे या सर्व प्रक्रियांमध्ये खिलारे यांनी हस्तक्षेप करून त्यात अनियमितता केल्याचे आरोपही केले जात आहेत. अलीकडे त्यांची बदली होणार होती. मात्र ती बदली थांबविण्यासाठी त्यांनी ठाणे येथे जाऊन आटोकाट प्रयत्न करून ती थांबवली असेही समजते. आजवर त्यांनी केलेल्या कामावर अनेकांनी प्रश्नचिन्हे उपस्थित केले आहेत. अखेर शासनाने १५ सप्टेंबर रोजी खिलारे यांची मुरबाड गट विकास अधिकारी रिक्त पदावर बदली केली आहे.
त्यांचा कार्यभार घेण्यासाठी कोल्हापूर येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी अडसूळ यांची बदली केली असून तसे आदेशही झाले आहेत. मात्र अजूनही त्या कार्यमुक्त का होत नाहीत असा सवाल सदस्य विचारत आहेत. त्यांना पुन्हा एकदा पालघर जिल्हा परिषदेत राहावयाचे असल्याने त्या कार्यमुक्त होत नाहीत का ? किंवा जाणून बुजून त्यांना कार्यमुक्त केले जात नाही असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्या स्वतः सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुख असल्याने त्यांनी त्यांच्या कार्यामुक्तीचे प्रकरणही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आजतागायत पाठविले नाही. याचाच अर्थ त्याना कार्यमुक्त व्हायचे नसून पुन्हा एकदा पालघर जिल्हा परिषदेतच इतर ठिकाणी येण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत होता. मात्र याबाबत नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दखल घेत त्यांना शुक्रवारी संध्याकाळी कार्यमुक्त केले असून त्यांचा अतिरिक्त पदभार तुषार माळी यांच्याकडे देण्यात आला आहे.
नवनियुक्त जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी संघरत्ना खिलारे यांनी कामात अनियमितता केल्याबाबत अविश्वास दाखविला होता. त्याचबरोबरीने त्यांच्या मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून केली जावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सभेत केली आहे.
डहाणू तालुक्यामधील स्वछता व पाणीपुरवठा विभागाच्या योजना जिल्ह्यातून तालुक्यात आणण्यासाठी खिलारे यांनी टक्केवारी घेऊन त्या योजना दिल्या असल्याचे आरोप तेथील पंचायत समितीचे तत्कालीन पदाधिकारी यांनी केले आहेत.
जिल्हा परिषदेत कंत्राटी अभियंता पदे भरतीदरम्यान खिलारे यांच्या पतीनी अपात्र असतानाही या पदासाठी अर्ज केला होता. मात्र त्यानंतर यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने हे प्रकरण तेथेच शांत झाले होते.
प्रतिक्रिया :-
जिल्हा परिषदेत एका अधिकाऱ्याने इतका काळ राहणे अपेक्षित नाही. जिल्हा परिषदेची छवी असलेले असे अधिकारी आम्हाला नकोत. बदली झाल्यानंतरही कार्यमुक्त होत नाही की केले जात नाही असा माझा सवाल आहे.
शैलेश करमोडा, जिल्हा परिषद सदस्य
पालघर
प्रतिनिधी - राजेंद्र पाटील
__________
Also see : केडीएमसी लवकरच उभारणार पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर
https://www.theganimikava.com/KDMC-to-set-up-Post-Covid-Rehabilitation-Center-soon